Pages

Tuesday, October 21, 2014

रविंद्र रामहरस गुप्ता

नाव – रविंद्र रामहरस गुप्ता
शिक्षण – ६ वी
वय – १२ वर्षे
व्यसन – नाही
संपर्क तारीख – १९.०४.१४
पत्ता – साई सावली चाळ, हनुमान नगर, रोड नं. ३४, वागळे ईस्टेट, ठाणे
       रविंद्रला घरात राहण्यापेक्षा मित्रांसोबत बाहेर फिरणेच फार आवडते. १२ वर्षांच्या रविंद्रला आपल्या कुटुंबापेक्षा मित्रपरिवार फार प्रिय आहे. त्यामुळे घरात न सांगता रविंद्र मित्रांसोबत सतत बाहेर भटकायला जात असतो. बाहेर फिरणे ही रविंद्रसाठी एक नशाच जडली आहे. फिरण्याची ही नशा त्याला इतकी घातक ठरली की, त्याच्या आईचे अंतीम दर्शनही त्याला घेता आले नाही.
       रविंद्रचे वडील पाचएक महिन्यांपूर्वीच वारले. त्या दु:खाने त्याच्या आईने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. औषधोपचारासाठी ती इस्पितळात असते. त्यामुळे घरी फक्त रविंद्रचे दोन भाऊ असे तिघच जण राहत असत. आई-वडील घरात नसल्यामुळे रविंद्रला बाहेर फिरण्याची संधी नेहमीच मिळत असे. तो स्वत:च्या मर्जीने घरात वागायला लागला होता. १७ वर्षाचा मोठा भाऊ काहीतरी काम करून उदरनिर्वाह करत असे. त्याला आपल्या लहान भावांची काळजी होती. पण रविंद्रला मात्र आपल्या भावांविषयी प्रेम नाही असेच त्याच्या वागणुकीवरून वाटत राहीले. कारण रविंद्र सुरूवातीपासून समतोल कार्यकर्त्यांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वांना खोटी देत होता. स्वत:च्या माहीतीतील त्याने फक्त स्वत:चे नाव खरे सांगितले. रविंद्र घरातून बाहेर पडल्यापासून त्याच्या भावाने त्याला शोधण्यास सुरूवात केली होती. पोलिस स्टेशनला तक्रार देऊन ठेवली होती. पण रविंद्र मात्र सी.एस.टी स्थानकात आपल्या मित्रांसोबत मौजमजेसाठी भटकत होता. मित्रांसोबत मौजमजा करून रात्री उशिरापर्यंत घरी जाणे हा त्याचा दैनंदिन कार्यक्रम झाला होता. रविंद्रला ना स्वत:च्या भविष्याची चिंता होती ना स्वत:च्या कुटुंबाची. मित्रपरिवार त्याच्यासाठी सर्वस्व होते. योग्य मार्गदर्शनाअभावी, अयोग्य पालनपोषणामुळे रविंद्रच्या आयुष्याची दिशा भरकट चालली होती. त्यातच एक दिवस सी.एस.टी स्थानकात फिरत असताना रविंद्रवर समतोलच्या कार्यकर्त्या रूचिता जाधव यांची नजर पडली.
       रूचिता ताईने त्याची विचारपूस करून त्याची समजूत घालून त्याला बालगृहात नेऊन ठेवले. कुटुंबियांचा संपर्क क्रमांक देण्याबद्दल ताईने त्याला समजावून पाहिले पण पत्ता न सांगण्याच्या निर्धारापुढे रुचिता ताई व पोलिस दोघेही हतबल झाले. सुदैवाने त्याने स्वत:चे नाव मात्र खरे सांगितले. त्यामुळे बालगृहात रविंद्र आहे हे त्याच्या भावाला शोधणे सोपे झाले. परंतु रविंद्रच्या दुर्दैवाने ज्या दिवशी रविंद्र घरातून पळाला त्याच दिवशी त्याचे आईचे निधन झाले. रात्री उशिरापर्यंत रविंद्रची वाट पाहत त्याच्या आईचा देह ठेवण्यात आला होता. परंतु तो घरी न आल्यामुळे शेवटी नाईलाजाने त्याच्या भावाने आईचे अंतीम संस्कार केले. पण आपल्या आईचे निधन झाले याचे मात्र रविंद्रला काहीही वाटत नव्हते. जर का त्याने रुचिताताईंना किंवा पोलिसांना स्वत:चा पत्ता किंवा संपर्क क्रमांक दिला असता तर कदाचित त्याला आपल्या आईचे अंतीम दर्शन झाले असते. पण त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे तो कुटुंबापासून देखील दूर जात होता. पण या गोष्टींपेक्षा त्याला फिरणे, मौजमजा करणे अधिक पसंतीचे आहे.
       रविंद्रची काळजी त्याच्या मोठ्या भावाला आहे. त्यामुळे त्याचा शोध घेत तो भटकत होता. त्याची शोधमोहीम सी.एस.टी स्थानकात येऊन थांबली. तिथे त्याला समजले रविंद्र बालगृहात आहे. त्याने तडक जाऊन आपल्या रविंद्रला तिथून घरी आणले. बालगृहात आपल्या भावाची भेट झाल्यानंतरही रविंद्रला आनंद झालेला दिसत नव्हता. रविंद्रसारख्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची, आपुलकीची व मायेच्या प्रेमाची गरज असते. अशा भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा मिळवून देण्याचे, त्यांच्या कुटुंबाशी संवाद घडवून आणण्याचे काम समतोल करते.

No comments:

Post a Comment