Tuesday, October 21, 2014

बिलाल जमाल अंसारी (खान)

नाव – बिलाल जमाल अंसारी (खान)
वय – १३ वर्षे
शिक्षण – ६ वी
संपर्क तारीख – २१.२.२०१४
पत्ता - शांती नगर भिवंडी, गोसीया मझीदच्या मागे, गाव - बस्ती, जिल्हा - युपी
       आज गावी जायचेच असा विचार करून बिलालने घरात प्रवेश केला. आईकडून त्याने २० रू. रूपयांची मागणी केली. पण आईला बिलालने गावी जाऊ नये असे वाटत होते त्यामुळे तिने पैसे देण्यास नकार दिला. खूप विनवण्या करूनही बिलाल आईपुढे तग धरू शकला नाही. पण क्षणाक्षणाला त्याचा रागाचा पारा मात्र चढत होता. आई आपल्याला मनासारखे वागू देत याची त्याला चीड येत होती. आपण काम करतो, त्याचे पैसेही आई घेते. पण बिलालला आपली आई आर्थिक ओढाताणीने ग्रासली आहे हे त्याला कळत नव्हते. वडील सतत दारूच्या नशेत धुंद असतात. त्यामुळे बिलालची आई घरीच मोती ओवणे, कटींग यांसारखी कामे आणून करत असे. त्यावर ती आपला संसार चालवत होती. बिलालला या सर्व गोष्टी माहीत असूनही तो न समजल्यासारखा वागत होता.
       त्याला फक्त गावी जाऊन मजा करायची होती. त्यामुळे १३ वर्षे वय असलेल्या बिलालने आईने गावी जाण्यासाठी २० रू. दिले नाहीत म्हणून रागाने घर सोडले. त्याला भिवंडीतील घरापेक्षा गावात राहणे जास्त आवडत होते. त्यामुळे सतत आईजवळ “मला गावी नेऊन सोड, तिथेच शाळेत घाल” असे तो सांगत असे. परंतु आई-वडिलांना त्याचे गावी जाणे फारसे पसंद नव्हते. बिलाल भिवंडीत एका किराणा मालाच्या दुकानात काम करत असे. महिनाकाठी त्याला ३०००/- मिळत असत. बिलाल शाळेत न जाता कामावर जात असे. यापूर्वी २/३ वेळेस बिलाल घरातून पळाला होता. परंतु दोनएक दिवसात तो पुन्हा घरी आला होता. त्यामुळे यावेळेस घरातून पळाल्यावर त्याच्या पालकांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. मुलाला जाऊन महिना झाला तरी त्यांनी त्याची चौकशी केली नाही. पालकांच्या मते, बिलालला घरातून पळून जाण्याची सवयच जडली आहे त्यामुळे तो पुन्हा घरी परत येईल या आशेवरच वाट पाहत राहिले. शिवाय वडील नेहमी दारूच्या नशेत धुंद असल्यामुळे त्यांना बिलालच्या घरी असण्याबद्दल किंवा नसण्याबद्दल काहीच वाटत नाही, कुठल्याही प्रकारची खंत नाही. त्यामुळे बिलालला घरातून एक महिना झाला तरी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली नव्हती.
       घरातून पळाल्यानंतर काय करावे हा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर होता. कारण गावी जायचे तर हातात पैसे नव्हते. पैशाशिवाय त्याला खातापिताही येत नव्हते. शेवटी बिलालने त्याच्या दुकानाच्या शेटकडून गावच्या प्रवासासाठी ५००/- रू. घेतले. परंतु गावी जाणारी गाडी कोणती हे त्याला माहीत नसल्यामुळे तो चुकीच्या रेल्वे गाडीत बसला. त्या रेल्वेतून तो बिहारला पोहचला. तिथे पोहचल्यावर त्याच्या लक्षात आले आपण गावी न पोहचता चुकीच्या ठिकाणी पोहचलो आहोत. तिथून परत त्याने रेल्वे पकडली व सी.एस.टी स्थानकात दाखल झाला. सी.एस.टी स्थानकात एका अनोखळी व्यक्तीसोबत फिरताना बिलाल समतोलच्या कार्यकर्त्या रूचिता जाधव यांना सापडला. बिलाल सोबत बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या लक्षात आले ज्या व्यक्तीसोबत तो फिरतोय ती व्यक्ती त्याच्यासाठी अनोखळी आहे.
       झाले असे की, सी.एस.टी स्थानकात एका व्यक्तीने बिलालला एकटं भटकताना पाहून त्याला जेवायला दिले. एक जोडी कपडे दिले. त्यानंतर “आपण पिच्चरला जाऊ” असे त्याने सांगितले. अर्थात, त्या माणसाचा हेतू वाईट होता हे नक्की. त्याच्यापासून आपणास धोका आहे हे बिलालने ओळखले. त्यामुळे बिलाल पिच्चरला न जाता पुन्हा सी.एस.टी स्थानकात येऊन बसला. त्याच दरम्यान कार्यकर्त्या रूचिता जाधव यांना तो सापडला. त्याची चौकशी करून त्याला शेल्टरमध्ये येण्यास समजवण्यात आले. त्याच दरम्यान समतोलचा कॅम्प चालू होता. तेव्हा त्याला कॅम्पमध्येच न्यावे असे ठरवण्यात आले. सुरूवातीला त्याने कॅम्पमध्ये येण्यास नकार दिला. कॅम्पमध्ये आल्यावर तेथे राहण्यासही नकार दिला. तिथून त्याने पळ काढला. पण काही वेळाने पुन्हा कॅम्पमध्ये तो स्वत:हून आला. सुरूवातीला बिलाल कॅम्पमध्ये कुणाशीच बोलत नव्हता. त्याला शिक्षणाची देखील आवड नसल्याचे समजले. आई घरी कटींग, प्रेसींग, मोती ओवणे यांसारखा जो जोडधंदा करते त्यात तिला मदत करायची असे त्याचे म्हणणे आहे. पण समतोलमध्ये मात्र त्याला सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याची सवय लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅम्पमध्ये येण्यास नकार देणारा बिलाल थोड्या दिवसांनी मात्र कॅम्पच्या वातारणात मिसळू लागला. अभ्यासाला कंटाळा बिलाल खेळात मात्र हुशार आहे. कॅम्पमध्ये कॅरम व इतर खेळ खेळण्यास त्याला आवडतात. कॅम्प संपल्यानंतर मात्र त्याला घरी जाण्याची इच्छा आहे. अर्थात समतोल बिलालची काळजी घेऊन त्याला योग्य दिशा दाखवून घरी सुखरूप सुपूर्त करेल.

No comments:

Post a Comment